१५ ऑगस्ट /स्वातंत्र्य दिन




     "१५ ऑगस्ट हा आपल्या भारत देशाचा स्वतंत्रता दिवस. याच दिवशी ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या विळख्यातून भारत स्वतंत्र झाला. त्यामुळेच १५ ऑगस्ट या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन आपण सर्वच जण उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो. आपल्या भारतात हा एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. यादिवशी शाळा, महाविद्यालये, संस्था, ऐतिहासिक ठिकाणे तसेच काही सार्वजनिक ठिकाणी सुद्धा १५ ऑगस्ट दिवशी ध्वजारोहण आणि ध्वजवंदन मोठ्या आदराने, आपुलकीने साजरे करतात. १५ ऑगस्ट दिवशी लाल किल्यावर प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. ध्वजारोहणानंतर लाल किल्यावर प्रधानमंत्री आणि तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांसारख्या थोर नेत्यांना आणि शूरवीरांना श्रद्धांजली वाहतात. 


 भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्वच ज्ञात अज्ञात व्यक्तींचे या दिवशी स्मरण केले जाते. राजधानी दिल्लीमध्ये राजपथावर सैन्यदले परेड करतात. यादिवशी सर्वच ठिकाणी आपला तिरंगा फडकवत एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात. आपल्या या देशाच्या झेंडयामध्ये तीन रंग आहेत म्हणूनच आपण याला तिरंगा म्हणतो. हा तिरंगा आपल्याला एकात्मतेचा संदेश देतो. यामधील प्रथम केशरी रंग हे त्याग आणि धैर्याचे प्रतीक आहे. पांढरा रंग शांतीचे प्रतीक आहे तर हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे. त्यामधील निळ्या रंगाचे अशोकचक्र हे प्रगतीचे प्रतीक आहे. 


 १५ ऑगस्ट हा सोनियाचा दिवस आपण ज्यांच्यामुळे पाहू शकलो त्यांची आठवण आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो. या दिवशी भारतात बहुतांश सर्वांनाच सुट्टी असते. या दिवशी ब्रिटिश साम्राज्याच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला आणि भारत एक संघराज्य म्हणून ओळखले जाऊ लागले. जगाच्या नकाशात भारत एक स्वतंत्र देश म्ह्णून ओळखला जाऊ लागला. १५० वर्षे आपल्या देशातील लोकांनी या ब्रिटिशांच्या गुलामगिरीत काढली, हालअपेष्टा सहन केल्या. कित्येकांना फाशीची शिक्षा देण्यात आली तसेच कित्येकांना तुरुंगवासही भोगावा लागला. 


 ब्रिटिशांविरुद्ध त्यावेळी अनेक युद्धे झाली त्यावेळी अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले. कित्येक लोकांचे संसार नष्ट झाले. अनेक नेत्यांनी मिळून आंदोलने केली तसेच अनेक कठीण प्रसंगांनाही त्यांनी तोंड दिले. हे करत असताना ब्रिटिश सरकार कडून जुलूम जबरदस्ती सहन करावी लागली आणि काहींना तर आपले प्राणही गमवावे लागले. या सर्वच ज्ञात अज्ञात लोकांमुळे त्यांनी केलेल्या अथक परिश्रमांमुळेच हा सोनियाचा दिवस आपण पाहू शकलो. 


 स्वातंत्र्य मिळाल्यावर आपली एक राज्य पद्धती अवलंबण्यात आली. आपले एक संघराज्य निर्माण झाले. त्यामध्ये लोकांनी निवडलेले लोकप्रतिनिधी कारभार पाहणार. कोणी राजा नाही आणि कोणी प्रजा नाही. संघराज्य म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी आपल्या देशाची राज्यघटना लिहिली. या राज्यघटने नुसारच आपल्या देशातील कायदेकानून आणि कारभार चालतो, म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घटनेचे शिल्पकार असेही म्हणतात. 


 आपल्या या स्वतंत्र भारत देशात सर्व धर्माचे लोक राहतात. हे लोक स्वातंत्र्याआधीही राहत होते आणि आत्ताही राहतात. जसे कि हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध म्हणूनच आपला देश हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून सुद्धा ओळखला जातो. आपल्या देशाने सर्व धर्म समभाव अंगी स्वीकारला आहे. त्याचप्रमाणे एक मोठा लोकशाही असलेला देश म्हणून सुद्धा आपल्या देशाची संपूर्ण जगात ओळख निर्माण झाली आहे. 


 स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपले योगदान दिले. स्वातंत्र्यासाठी लढताना ब्रिटिशांचा कावेबाजपणा आणि जुलुमजबरदस्ती पाहून काहींनी त्यांच्यावर शस्त्र उगारले. १८५७ चे स्वातंत्र्यसमर तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे यांनी गाजविले. पुढे त्यानंतर सशस्त्र उठाव करून वासुदेव बळवंत फडके, क्रांतिवीर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, चाफेकर बंधू इत्यादींनी आपला निषेध शस्त्रांसह दाखविला. यातील काही शूरवीरांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या केली. रानडे, टिळक, गोखले, आगरकर यांनी लेखणीचे आणि वाणीचे सामर्थ्य वापरून ब्रिटिशांकडून होणारा अन्याय आणि जुलूम यांची सामान्य जनतेला जाणीव करून दिली आणि ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी प्रात्साहन दिले. 


 महात्मा गांधी यांच्याकडे देशाचे नेतृत्व आल्यावर सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गाने जाण्याचा संदेश त्यांनी सामान्य जनतेला दिला. त्याचबरोबर स्वावलंबन असहकार अशा मार्गांनी सर्व भारतीयांना ब्रिटिशांविरुद्ध आंदोलने करण्याची शिकवण दिली. तसेच विदेशी वस्तूंचा वापर न करता स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचा संदेश दिला. अशा प्रकारे आपल्या या थोर नेत्यांनी, शूरवीरांनी अथक परिश्रमातून ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. खरचं आपण सर्वांनीच आपले भाग्य समजले पाहिजे की, अशा या स्वतंत्र भारतात आपला जन्म झाला. 


 त्याचप्रमाणे या शूरवीरांना आदरांजली म्हणून आपण सर्वांनी १५ ऑगस्ट या दिवशी एकत्र मिळून हा दिवस साजरा केला पाहिजे. परन्तु आज कोरणाचा प्रादुर्भाव असल्याने शासकीय नियमाचे पालन करूया ,घरूनच शूरवीराना सलाम करूया व स्वातंत्र्य दिन साजरा करूया                        






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा